Monday, September 13, 2010

भाजप नेते म्हणतात योगायोग...

अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात २४ सप्टेंबर ही तारीख निश्चित केलीय. म्हणजे अयोध्यप्रश्नी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा विसावा वर्धापनदिन २३ तारखेला एक दिवस अगोदर आहे. असं असलंतरी भाजप या निकालाबाबत आशावादी आहे.अयोध्याप्रश्नी भाजपमध्ये सध्या शांतता आहे. हा निकाल न्यायालयात असल्यानं भाजप नेते कुणीही या वक्तव्यावर मत व्यक्त करण्यात तायर नाही. निकालाबाबत पक्षानं वेट अँन्ड वॉचची भूमिका स्विकारलीय.
हे खरं असलं तरी अडवानी यांनी आपल्या ताज्या ब्लॉगवरील लेखात अयोध्यानिकाल आणि आपल्या रथयात्रेला वीस वर्ष पूर्ण याविषयी विवेचन केलय. या दोन्ही घटना एक दिवसाआड पाठोपाठ येत आहे. अडवानींनी म्हणतात,माझे रोल मॉडेल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे. सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्राही 1990 मध्ये त्याच दिवशी काढली. त्याच दिवशी मी अजूनही नियमितपणं सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी जातो. आता तर अयोध्या प्रकरणाचा निकाल 25 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारांय. हा सर्व योगायोग असल्याचे मी मानतो असं नमूद केलय. अयोध्या प्रकरणी पक्षनेते काहीही बोलण्यास तयार नाही,असं असलंतरी दर आठवड्याला भाजप मुख्यालयाशेजारी आंग्लभाषिक पत्रकारांचा दरबारच भरलेला दिसतो. त्यामुळं पक्षने त्यांची गोची झालीय. त्यांना पत्रकारांना काहीच माहिती देता येत नाही.
पक्षाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नितीन गडकरीनी अयोध्या प्रश्‍न घटनेच्या चौकटीत सुटावा, असं मत मांडलं होतं. भाजपमध्ये सध्या गडकरी गट विरूध्द राजनाथसिंह गट यांच्यात शीतयुद्धाचं वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकालानंतर गडकरी यांचे ते मत कायम राहील काय, काय पडसाद उमटतात याबाबतही उत्सुकता आहे. निकाल विरोधात गेल्यास काही वरिष्ठ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठावण्याचं निश्चित केलंय. अयोध्या प्रकरणाबाबत लिबरहान आयोगाचा अहवाल फेटाळणाऱ्या भाजपची केंद्रात सहा वर्षे सत्ता होती. त्यावेळेस हा अहवाल का आणला गेला नाही, अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल त्या काळात का लागला नाही, या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे नाहीत.

Saturday, September 11, 2010

हे वागणं बरं नव्हं...!

कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभ म्हटला की,राजकारण्यांचा सहभाग असतोच,किंबहुना त्यांच्या सहभागाशिवाय असे सोहळे पार पाडणं म्हणजं जरा जिकरीचंच....याला राष्ट्रकुल स्पर्धेची क्विन्स बॅटन तरी कशी अपवाद असू शकते...राज्याच्या दौ-यावर असलेल्या या बॅटनच्या निमित्तानं सध्या राजकारण्यांची चमकूगिरी हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
खेळ, खेळाडू, संघ आणि पुढारी...हे एक एकमेकांशी संबंधीत घनिष्ट नातचं. त्यामुळंच स्थानिक,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच खेळांच्या संघटनावर खेळाडू, प्रशिक्षकांपेक्षा पुढारीच पदाधिकारी दिसतात. किंबहुना त्यांच्या आर्शिवाद, मार्गदर्शनाशिवाय संघटनांचं कार्य चालणं तसं अवघडच. आणि मग स्वभाविकच त्यांना स्पर्धा मग ती गल्लीतली असो कि दिल्लीतली प्रत्येक कार्यक्रमांसाठी बोलवणं अपरिहार्यच... कार्यक्रमास न बोलवणं, सत्कारासह योग्य आदरातिथ्य न ठेवल्यास त्यांचे रूसवे-फुगवे आणि संबंधितांवर काट धरत उट्टे काढणं आलेच....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा बिगुल आता जोरात वाजू लागलंय. बॅटन रिले या स्पर्धेच्या संयोजन आणि उद्घाटन सोहळ्याचा महत्वपूर्ण भाग आहे, त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संयोजक या बॅटनची सर्वजण काळजी घेतांना दिसताय, हे खरं असलंतरी बॅटन स्वागताच्या निमित्तानं राजकारण्यांची चमकूगिरी दिसून येतेय. खेळाडूंपेक्षा बॅटन हातात घेऊन धावतांना आपलीच छबी वृत्तपत्रात, वाहिन्यांवर कशी झळकेल याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौरांसह इतर पुढारी घेतांना दिसतात. त्यासाठी अगदी खेळाडूं, जेष्ठ प्रशिक्षकांनाही मागे हटवून स्वतः पुढे येण्यासाठी चढाओढच पहायला मिळते, अगंदी आपणच स्पर्धेचं मुख्य संयोजक, यजमान आहोत, अशा थाटात हे सर्व पध्दतशीर सुरुय.
बॅटनचा कोल्हापूर, पुण्यामार्ग मुंबईत प्रवास सुरु झाला. या तिन्ही ठिकाणी राजकारण्यांच्या चमकूगिरी पहायला मिळाली. बॅटनचे जल्लोषात स्वागत झाले.सोहळा आटोपला आणि आपले फोटोसेशन कम्पिलट झाल्याची खात्री झाली की, हे सगळे चमकू पुढारी झाले एकदाचे मोकळे.....मग खेळाडू, प्रशिक्षक बॅटन पुढे घेऊन गेलेत की नाही, बॅटनचा प्रवास व्यवस्थित सुरुय की नाही, याचं त्यांना काही देणं घेणं नाही.
स्वतःच्या प्रसिध्दी नव्हे तर आपल्या शहर, जिल्ह्यात ही बॅटन आल्यानं तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच, असं स्वागताच्या कार्यक्रमातच ठामपणे सांगायलाही हे पुढारी विसरत नाही. प्रत्येकजण स्वागताच्या कार्यक्रमांशी संबंधीत आपलं मत ते ही अगदी सोयीस्करपणे मांडतांना सध्या दिसत आहे. ईद, गणेशोत्सवासारखे उत्सव असल्यानं बॅटनचा मुंबईतला प्रवास कमी केला. अन्यथा मुंबईत प्रत्येक भागातल्या पुढा-यांनं आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बॅटनच स्वागत केलं असतं, एवढ्यावरच न थांबता आपली छबी चमकेल कशी याकडं केंद्रीत केलं असतं. बॅटननं २५ जूनला भारतात प्रवेश केला. आतापर्यत १६ हजार ६५२ किलोमिटरचा प्रवास पूर्ण झालाय. सर्व राज्यात खेळाडू, प्रशिक्षक,संघटनापेक्षा राजकारण्यांची चमकूगिरीच पहायला मिळाली. अनेक ठिकाणी बॅटनबरोबरच राष्ट्रकुलमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवर टीका झाली. पण त्यांला सोयीस्कर बगल देण्याचाही प्रयत्न संयोजकांच्या माध्यमातून पहायला मिळाला. बॅटन स्वागताच्या निमित्तानं अगदी महाराष्ट्रातसुध्दा हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांला पध्दतशीरपणे टाळले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रचार प्रसारास सर्वाधिक प्राधान्य संयोजन समितीनं दिलं, बॅटनच्या जोडीला आता कॉमनवेल्थ ट्रेनचाही प्रवास सुरु झालाय़. या प्रवासातही क्रीडाप्रेमींच्या जोडीला पुढा-यांची चमकूगिरी पहायला मिळतेय...पुढा-यांशिवाय क्रीडासंघटना, संस्थाचं पान हलत नाही...हे जरी खरं असलंतरी पुढा-यांनी खेळाडू, प्रशिक्षकांचा असलेल्या बॅटन स्वागताच्या कार्यक्रमात किती चमकूगिरी करावी हा एक प्रश्नच आहे.