Saturday, November 27, 2010

मराठी बाणा जपणारा लोकशाहीर

लोकशाहीर विठ्ठल उमप....उर्फ सर्वांचे अण्णा....महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा ठेवा जपणारा ऐंशी वर्षाचा एक उमदा...कलावंत...आपल्या जेष्ठत्वावर मात करत तरूणांना लाजवेल असंच जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीमत्व...शाहीरीला जागतिकस्तरावर वेगळं स्थान, नावलौकीक मिळवून देणारे लोकशाहीर आपल्यातून इतक्या सहजपणे जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती....
नाशिकला कालीदास कलामंदीरात झालेल्या एका कार्यक्रमांसाठी उमप आले होते...त्याचे जांभुळ आख्यान नाटक आणि मी मराठी हे अलिकडच्या काळातील कलाविष्कार मी पाहिले होते. त्यामुळं त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती...पण त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळं ते सहज शक्य होत नव्हतं...अखेर पत्रकार असल्यानं आपल्या पत्रकारितेचा त्यांच्या भेटीसाठी वापर करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांच्याच जवळच्या एका कार्यकर्त्यांला जवळ घेऊन शाहीरांशी गप्पा मारण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे हवी, असं सांगितलं. त्या कार्यकर्त्यांनंही लगेच शाहीरांच्या कानात निरोप सांगितला आणि काय आश्चर्य काही वेळानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून ते बॅक स्टँजला असलेल्या कक्षात आले आणि मग काय सुरु झाली गप्पाची मैफल...कौटुंबिक परिवार, शालेय शिक्षण, शाहीरीची सुरवातीपासून तर जांभुळ आख्यान आणि अगदी अलिकडच्या मी मराठी कलाविष्कारापर्यत गप्पाची मैफल रंगत गेली...मध्येच मी गाण्यांची फर्माईश करत आणि शाहीरानीही मोठ्या अदबीनं फु बाई फु, माझी मैना गावाकडं राहिली,फाटकी नोट, ए दादा आवर ये...अशी गाण गात मला सुखद अनुभव दिला...आंबेडकरी चळवळीतील आठवणी सांगतांना त्यांनी हा माझ्या भीमरायाचा मळा...हे गाजलेले गीत ऐकवत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा महिमाच माझ्यासमोर कथन केला....एवढ्या वयांतही त्यांच्या आवाजातला एक वेगळा बाज मला अनुभवायला मिळत होता...केवळ विचारलेल्या प्रश्नांनाच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक माहीती मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली...त्यांचे काही काही प्रसंग तर थक्क करून सोडणारं होते....पोवाडा, कव्वाली भारूड, गझल अभंग की छक्कड लावणी असो असे सारंच प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचां त्यांचा वेगळा हातखंड मला पहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाला...गप्पाची मैफल सुरु असतांनाच मध्येच आपल्या स्वयंसेवकांकडून कार्यक्रमांच्या तयारीचा आढावाही ते घेत होते....मी त्यांच्याकडं फक्त दहा मिनिटांची वेळ मागितली होती मात्र शाहीरांनी माझ्याशी तब्बल पंचवीस मिनिटे गप्पा मारल्या...गप्पानंतर ते लगेचच आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी रंगमंचाकडे गेले...मात्र जाण्यापूर्वी त्यांनी माझं नाव पुन्हा एकदा विचारलं...मी नाव सांगितलं श्रीकृष्ण कुलकर्णी...श्रीकृष्ण म्हणजे किसना, कृष्णा होय...बरं बघ तुझ्यावरही मी एक गाणं रचलय..मी लगेचच म्हटंल कुठले ते...आणि त्यांनी लगेचच कृष्णा धमाल रे...हे प्रसिध्द गाणं म्हणतं गात रंगमंचाकडं जाण्यास सुरवात केली...मी फक्त त्यांच्या या अनोख्या व्यक्तीमत्वाकडं पाहतंच राहिलो....