Saturday, June 28, 2025

`आरोग्यम् धनसंपदे`साठी `योग आणि आयुर्वेदशास्त्र`

       




     

       २१ जून २०१५….. पासून  संपूर्ण जगामध्ये  आंतरराष्ट्रीय  तथा  जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. हा  जागतिक योग दिवस  साजरा करण्याची परंपरा सुरु करण्याचे श्रेय आदरणीय पंतप्रधान 
श्री नरेंद्रजी मोदी याना जाते. गेली १० वर्षे  जगातील सुमारे १२५ देशांमध्ये हा दिवस आनंद व उत्साहाने साजरा केला जातो. यंदाही २१ जूनला त्याच जोश आणि उत्साहात नाविन्यपूर्ण रीतीने साजरा केला जाणार आहे . भारत सरकारच्या  आयुष मंत्रालयाने हा  11 वा जागतिक योग दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्च २०२५ पासूनच साजरा करण्यास सुरुवात केली आहे . योग संगम , योग बंधन , योग पार्क , योग समावेश , योगप्रभा , योग कनेक्ट , हरित योग , Yoga Unplugged, योग महाकुंभ , समयोग  असे १० महत्वपूर्ण  उपक्रम संपूर्ण भारतात  व जगात आयोजित करण्यात आले होते…. वैद्य डॉ.एकनाथ कुलकर्णी

           योग संगम या कार्यक्रमातून योगाची प्रात्यक्षिके  एक  लाखाहुन अधिक ठिकाणी करण्यात आली तर योग बंधन  या उपक्रमातून  १० देशांशी योग सत्रे घेण्यासाठी भागीदारी करण्याचे नियोजन झाले. योग पार्क या उपक्रमातून १००० ठिकाणी  समाज स्वास्थ्यासाठी  योग उद्याने विकसित आगामी काळात केली जाणार आहे. योग समावेश या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले  यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आले. योगप्रभाव या प्रकल्पातून  गेल्या १० वर्षात  सार्वजनिक  आरोग्यावर योगाचा काय प्रभाव पडला आहे याचे मूल्यांकन करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले तर कनेक्ट  या उपक्रमातून जगातील आरोग्य व्यावसाईकांचे आगामी काळात आभासी संमेलन भरविण्यात येऊन सुसंवाद  साधला जाणार आहे.




हरित योगाद्वारे वृक्षारोपण अन् संवर्धनाचा संदेश  

    हरित योग या उपक्रमातून वृक्षारोपण आणि  स्वच्छतेचे  कायम स्वरूपी अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले तर Yoga Unplugged    या उपक्रमातून युवक व युवतींना योगशास्त्राकडे आकर्षित करण्याचे व महत्व पटवून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहे. योग महाकुंभ  हे  योगमहोत्सव सप्ताह  १० ठिकाणी   माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. समयोग हा १०० दिवसांचा  आधुनिक आरोग्य आणि योग यांचा समन्वय  साधणारा कार्यक्रम  सर्वांगीण आरोग्यासाठी राबविण्यास सुरवात झाली. एक पृथ्वी , एक आरोग्य – त्यासाठी योग  हे या वर्षीच्या  योग दिनाचे  घोषवाक्य निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार वर्षभर सर्व कार्यक्रम  संपूर्ण जगात राबविण्यात येणार आहे. भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

   योग आणि आयुर्वेद शास्त्राचे जागतिक महत्व सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे .  त्याचा लाभ वैद्यांनी घेतला पाहिजे . जागतिक एकात्मता  आणि स्वाथ्य याची आज जगाला गरज आहे. ही गरज  योग आणि आयुर्वेद ही  शास्त्रेच भागवतील . त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या  सर्वांचीच  जबाबदारी वाढत आहे . शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्तीचे योग हे समर्थ साधन आहे. आपल्या जीवनात  शांतता , स्थिरता , एकात्मता , निर्भयता  योगाभ्यासामुळे प्रस्थापित होते आणि टिकते . संपूर्ण विश्वात  शांतता प्रस्थापित करण्यासाठी  योगाभ्यास  उपयुक्त आहे.  सर्व वैद्यांनी  आयुर्वेदाबरोबरच  योगाचाही प्रचार व प्रसार केला पाहिजे. योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात  वैद्यांनी उत्साहाने सहभाग घ्यायला हवा 

Friday, April 11, 2025

रूग्णाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कंबरेच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला आले यश

 


       नाशिकः  वय ९१.....वजन फक्त ३३ किलो....साडी नेसतांना घरात पाय घसरून पडलेल्या एका वृध्द महिलेच्या कंबरेचे हाड( हिप जॉईंट) मोडले, निखळले अगदी घरांतच ती वृध्द महिला पडून, तिला उठवेना तसेच बसवेनाही,...पण कुटुबांने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना घरी बोलून कंबरेचा एक्स रे काढले, हाड निखळले असल्याने तसेच तातडीने शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला अस्थिरोग तज्ञ डॉ.जुगल पटेल,डॉ.प्रतीक पटेल यांनी दिला. वय जास्त आणि वजन कमी यामुळे ही शस्त्रक्रीया करणे हे एक जोखीम होती, डॉक्टरांसमोरही एक आव्हान होते, पण रूग्णांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला..

     त्याचे झाले असे, पोकार कॉलनी येथे राहणाऱ्या आणि ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या साधक असलेल्या लक्ष्मी श्यामदास अलवाणी(वय ९१ वर्षे) या केंद्रात जाण्यासाठी साडी नेसत असतांना त्यांचा साडीत पाय अडकला आणि त्या जागेवरच पडल्या आणि कंबरेचे हाड निखळले. वय खूप असल्याने जवळच असलेल्या जीवक हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना घरी बोलून त्यांचा एक्स रे काढण्यात आला. त्यात कंबरेचे हाड मोडल्याने, गॅप पडल्याचे( हिप जॉईंट) दिसले. शस्त्रक्रीया न केल्यास त्यांना जागेवरच बसून रहावे लागेल आणि तातडीने शस्त्रक्रीया केल्यास किमान घरभर तरी त्या चालू शकतील,असे डॉक्टरांनी सांगितले, रूग्णालयात दाखल केले. पण वय जास्त,वजन कमी आणि भूल दिली तरी ती चढेल,पुढे काय होईल, त्यातही यश कमी आणि जोखीमच अधिक असेल अशा सर्व बाबींची डॉक्टरांनी कुटूंबाना कल्पना दिली.

कुटूंबाचा शस्त्रक्रीयेचा निर्धार अन् डॉक्टरांचे परिश्रम

अखेर कुटूंबाने त्या वृध्द महिलेवर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेला मधुमेह,रक्तदाब यासारखे कुठलेही आजार किंवा शस्त्रक्रीया नाही तसेच एकही गोळी नसल्याने ती महिलाही शस्त्रक्रीयेस तयार झाली, तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि  डॉ.पटेल यांनी केलेल्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर शस्त्रक्रीया अखेर यशस्वी झाली. एक दिवस आपत्तकालीन कक्षात ठेवल्यानंतर तिला साधारण कक्षात स्थलांतरीत करण्यात आले आणि त्यानंतर दोन चार दिवसात घरीही पाठवण्यात आली. आता ती महिला पुर्वीप्रमाणे आपली स्वतःची कामे हळूहळू करू लागली असून चालता फिरताही येऊ लागले आहे.

   मी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी गेल्या तीस वर्षापासून जोडली गेलेली आहे, आमच्या केंद्रात ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवा ही नियमित चालते, माझाही या सर्व कार्यक्रमात नेहमीच सहभाग असतो, या नित्यध्यानधारणा आणि सेवेमुळे माझी इच्छाशक्ती वाढली आहे, नकारात्मक भाव दूर जाऊन एक सकारात्मक उर्जा या सर्व क्रियेतून मला मिळते, त्यामुळेच ही अवघड वाटत असणारी शस्त्रक्रीया सहजपणे होऊन गेली मला कळलेही नाही. नियमित साधनेचा उपयोग होत असतो म्हणून सर्वांनी कुठल्यातरी ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवेत आपले योगदान द्यायला हवे असे वाटते

श्रीमती लक्ष्मी श्यामदास अलवाणी,साधक,प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र,मेरी

Thursday, April 3, 2025

`ऊर्जे`वर सकारात्मक विचारमंथन,इजीएनचा महत्वपूर्ण पुढाकार

 


    

पर्यावरण….हवामान,जलवायु,माती,वनस्पती यासारख्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा एकत्रित संगम होय, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बदलते हवामान आणि सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या वाढत्या जंगलामुळे विजेसह इतर खूप सारे आपल्या समोर प्रश्न उभे राहिले आहे. अक्षय (सौर),पवन, रासायनिक, यांत्रिक ऊर्जा, अणु, गुरुत्वाकर्षण, प्रकाश, तेजस्वी, ध्वनी, गति, औष्णिक आणि विद्युत यासारख्या ऊर्जाप्रकारांद्वारे संचय करण्याचा प्रयत्न केंद्र-राज्य शासन,स्वायत्त,खाजगी संस्था अशा विविधस्तरावर सुरु आहेत. केवळ संचय नाही तर दिर्घकालीन उपाययोजनां, नियोजनही होऊ लागले आहे. पर्यावरण संवर्धन,रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अर्थ जर्नालिझम नेटवर्क(इजीएन)ने कोल्हापूरमध्ये याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संवादक,संपादकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. तिन्ही दिवस र्जाविषयावर सकारात्मक विचारमंथन होऊन भविष्यात एकत्रित काम करण्याचा संकल्प करण्यात आला. याच अनोख्या कार्यशाळेविषयी.......प्रा.श्रीकृष्ण कुलकर्णी

----------------------------

     पर्यावरण रक्षण,संवर्धन,हवामान बदलासारख्या ज्वलंत विषयावर काम करणाऱ्या अनेक सरकारी,खाजगी संस्था, कार्यकर्ते भारतात कार्यरत आहे. सर्वांगांने पर्यावरणाचा समतोल कसा साधला जाईल, यादृष्टीने सारेचजण वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत असतात. पण समाजात हवी त्याप्रमाणात जनजागृती,प्रबोधन होतांना दिसत नाही, त्यामुळे पर्यावरण,ऊर्जा,हवामान यासारखे विषय हे मर्यादित राहतात. आजच्या युगात पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऱ्हासामुळे मानवी कृती जबाबदार ठरत असल्याचे काही उदाहरणांवरून आपल् लक्षात येते. ऊर्जा संवर्धन,जलसंवर्धन,कचऱ्यांचे योग्य पध्दतीने निस्तारण(विल्हेवाट),प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टींमुळे पर्यावरणाचा समतोल चांगल्या पध्दतीन साधता येऊ शकतो. यासाठी अर्थ जर्नालिझम नेटवर्क(इजीएन) ने व्यापक चर्चेसाठी हे तीनदिवसीय खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.



ऊर्जा,जलसंवर्धन अन् कचऱ्यांद्वारे बायोगॅस निर्मिती

    प्रत्येक वर्षी २२ एप्रिलला पृथ्वी दिन आपण साजरा करतो. या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम होतात. पण हे सर्व प्रबोधन,जनजागृती त्या दिवसापुरतीच मर्यादित असते. वास्तविक पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा व्यापक विषय असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनातील विविध घटक,बाबींचा सुत्रबध्द पध्दतीने नियोजन केल्यास याच छोट्या छोट्या बदलांद्वारे मोठे परिणाम,परिवर्तन होऊ शकते. या तीन दिवसीय कार्यशाळेत याच क्षेत्रांतील तज्ञांनी विविध बाबींवर विशेष भर दिला. पहिल्या दिवशी पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावंकर यांनी सर्व संवादक,संपादकाचे स्वागत करत इजीएनची पर्यावरण व ऊर्जा क्षेत्रातील वाटचाल विषद केली. `इजीएन` ची भारताची जबाबदारी सांभाळणारे व्यवस्थापक जॉयदिप सेन गुप्ता यांनी भारतातील अक्षय (रिन्युएबल एनर्जी) ऊर्जेची स्थिती आणि ग्रीन हायड्रो प्रकल्पांवर आकडेवारीसह सविस्तर प्रकाशझोत टाकला.



हवामान बदलाचा कोकणावर मोठा परिणाम

  पर्यावरण अभ्यासक लेखक सतिश कामत यांनी हवामान बदलाचा कोकण परिसरावर होणारा परिणाम मांडला. या बदलामुळे पांरपारिक शेती,व्यवसाय सोडून लोक पर्यटन,मत्स व पुरक उद्योगासारख्या अन्यत्र व्यवसायांकडे वळाले आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी कोकणात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना विरोध होत असल्याची कोकणवासियांची मानसिकता त्यांनी नमूद केली. हवामान,पर्यावरण क्षेत्रात कामाची उभारणी करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी नव्या काळात हवामान बदल होत असतांना उर्जा टिकविण्याची आव्हाने मांडली. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात अणुउर्जा तज्ञ रमेश माथम यांनी अणूउर्जानिर्मिती ही छोट्या स्वरूपाच्या प्रकल्पांसाठी कशापध्दतीने( स्मॉल मॉड्युलर रिअँक्टर) पुरक ठरू शकते याबद्दल विश्लेषण केले.




किर्लीस्कर ऑईल इंजिन,महापालिका प्रकल्पांना भेटी

कोल्हापूर भागातील किर्लोस्कर आँईन इंजिनच्या प्रकल्पांला संवादक,संपादकांनी भेट देत तेथील सौर उर्जा,बायोगॅस,पवन उर्जा,इलेक्ट्रीक्ल वीज निर्मिती, जनरेटर प्रोजेक्टची सविस्तर माहिती घेतली.कचऱ्यापासून बायो डिझेल तयार करणे आणि बायोगॅसचा वापर करून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नास्ता,जेवन तयार करण्याचे प्रकल्प हे खरोखरच वाखण्याजोगे होते, कोल्हापूर महापालिकेचा खतप्रकल्प, तयार होणारे खत, कचऱ्यांपासून बायो गॅस आणि उर्जा निर्मितीचा त्याच ठिकाणी होणारा पुर्नवापर हे सुध्दा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अखेरच्या दिवसाच्या सत्रात प्रयास(पुणे) संस्थेचे शंतनु दिक्षित यांनी महाराष्ट्रातील अक्षय उर्जा(रिन्युएबल एनर्जी) निर्मिती घर,कृषी,उद्योग,व्यवसाय यासारख्या क्षेत्रांसाठीचे २०३०पर्यतचे ध्येय,प्रत्यक्ष निर्मिती,गरज आणि भविष्यातील साठवणूक, केंद्र,राज्य सरकारचे धोरण हे आकडेवारीसह सविस्तर मांडले. सर विश्वरैय्या यांच्या मार्गदर्शनाया विविध सत्राच्या तज्ञांच्या उर्जाविषयक सकारात्मक चर्चेमुळे पुढील काळात काम करण्यास नक्कीच उभारी मिळेल, यात शंका नाही

Wednesday, March 19, 2025

उधळूया रंग, जरी होतोय बेरंग!



        राजकारण’` हा केवळ एक भाग,क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला विषय नाही. क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक क्षेत्रात आपल्याला `राजकारण` हे चांगल्या-वाईट अशा वेगवेगळ्या अंगाने पहायला मिळते. मात्र  राजकीय पुढाऱ्यांची मग ते सत्तारूढ असो कि विरोधक यांच्याइतकी रंगाची उधळण कुणीच करत नाही, त्यामुळेच ते काय चेष्ठेचे, गंमतीचे आणि चर्चेचे विषय बनतात. आपण नेते आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत याचं भान विसरून काही नेते, पक्षश्रेष्ठी, सतत आपले शिवराळ भाषेचे रंग उधळत असतात. अमक्याला संपवून टाक, तमक्यांचा कोथळा बाहेर काढू वगैरे वगैरे `अशोभनीय` रंग वारेमापपणे उधळतात. काहीजण देशाबाहेर जाऊन आपल्याच देशाची बदनामी करणारे `दुर्देवी` रंग उधळत असतात. आपल्या समाजापुरता विचार करून  आपल्याच कोत्या मनाचे रंगही काहीजण उधळतात तर कुणी दुर्देवी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करून `बेशरमपणाचे` तर कुणी दादागिरीचे, दहशतीचे रंग उधळत असतात....प्रातिनिधीक स्वरूपात रंगपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांच्या संवादातून ही अनोखी रंगांची उधळण मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न....श्री राजेश अग्नीहोत्री, लेखक,संवादक,प्रशिक्षक(9975455454)

-------------------------------------------

 शिक्षक:  मुलांनो,सांगा बरं....रंगपंचमी कधी असते ते?

विवेक:  मी सांगु सर ?  मी सांगू ?

शिक्षक:  सांग बघू, परंतु भिंतीवरच्या कॅलंडरवर पाहून नको सांगूस

विवेक:  नाही सर, रंगपंचमी कधी असते ते आजकाल कॅलंडर न पाहताच सांगता येतं.

शिक्षक: अरे वा, ते कसं?

विवेक:  कारण आजकाल रोजचं रंगपंचमी खेळली जाते.

शिक्षक: रोजंच, म्हणजे रोजंच रंगपंचमी असते?

 विवेक :  हो सर.

शिक्षक: अरे बाळा फाल्गुन मासात कृष्ण पक्षात जी पंचमी तिथी येते ती रंगपंचमी!

 विवेक:  तुम्ही सांगत आहात तो रंगपंचमींचा सण!

पण तुम्ही विचारलं होतं रंगपंचमी कधी असते? म्हणून सांगितलं की रोजचं असते.

शिक्षक: म्हणजे तुझ्या मते रोज रंगपंचमी खेळतात?

विवेकः माझ्या मते रोज रंग उधळले जातात म्हणून त्या अर्थाने रोजचं रंगपंचमी खेळली जाते.

शिक्षक: रोज रंग उधळले जातात?  कुणाकडून?

विवेक:- सर तुम्ही वर्तमानपत्रे वाचत नाहीत? वृत्तवाहिन्या पहात नाही?  सोशल मिडीयावर सुध्दा तुमचं अकाऊंट नाही ?

शिक्षक:   मी तर दररोज वर्तमानपत्र वाचतो, रात्री टिव्ही वर बातम्या पहातो,शिवाय सोशल मिडीयावर पण आहेच, पण असं का विचारतो आहेस?

विवेक:  सॉरी सर,पण तिथे तुम्हाला दिसत असेलच की काही राजकीय नेते, काही तथाकथित बुध्दिजिवी, विविध आंदोलने चालवणारे काही नेते दररोज रंगांची उधळम करत असतातच की!  खंड पडतो का कधी?

शिक्षक:  विवेक,मलां असं वाटतं की तुला जे म्हणायचं आहे तु स्पष्टपणे सांगावसं, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुध्दा बोध होईल.

विवेक:  ठीक आहे सर, सांगतो तसं. पण माझं काही चुकत असेल तर माफ करावं.

शिक्षक: अरे तू सांग तर आधी. सांग बरं तु म्हणतोस तसं काही राजकीय नेते दररोज रंग कसा उधळतात?

विवेक: सर, पहा ना, आपण नेते आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत याचं भान विसरून काही नेते, पक्षश्रेष्ठी, सतत आपले शिवराळ भाषेचे रंग उधळत असतात. अमक्याला संपवून टाक, तमक्यांचा कोथळा बाहेर काढू वगैरे वगैरे `अशोभनीय` रंग वारेमापपणे उधळत असतात. तर काहीजण रोज सकाळी पत्रकारपरिषद घेऊन `अकलेचे तारे तोडणारे` रंग उधळत असतात. काही नेते दररोज जातीयवादाचे रंग उधळत असतात तर काही देशाबाहेर जाऊन आपल्याच देशाची बदनामी करणारे `दुर्देवी` रंग उधळत असतात. मला सांगायला पण लाज वाटतेय, परंतु काहीजण बायका-भानगडी यातून निर्लज्जपणाचे रंग उधळत असतात तर काही जण सर्वांची मते घेऊन फक्त आपल्या समाजापुरता विचार करून  आपल्याच कोत्या मनाचे रंग उधळत असतात. कुणी दुर्देवी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करून `बेशरमपणाचे` रंग उधळत असतात तर कुणी दादागिरीचे, दहशतीचे रंग उधळत असतात. कुणी जाहीरपणे महिलांबद्दल असभ्य भाष्य करून आपल्या विकृत रंगाची उधळण करत असतात तर कुणी परंपरांची थट्टा करत,अशोभनीयपणे स्टेजवर काखा खाजवत `असंस्कृतपणाचे` रंग उधळत असतात.

शिक्षक: अरे बास बास. राजकीय नेत्यांची रंगाची उधळण आली लक्षात, परंतु बुध्दिजीवी वर्ग तर समाजाचे प्रबोधन करणारा असतो. तू म्हणतोस ते देखील असले रंग उधळतात?

विवेक:  माफ करा सर, परंतु मला असं वाटतं की यातले कित्येक जण स्वयंघोषित बुध्दिजीवी असावेत. निवडणूका आल्या की निर्भय बना मोहिम चालवायची, मग निवडणुका संपल्यावर ती मोहिम बासनात गुंडाळून ठेवायची, निवडणूकांचे निकाल लागल्यावर ईव्हीएम च्या नावाने बोंब मारायची मात्र निवडणूक आयोगाने यंत्र तापसणीचं आवाहन केल्यावर तोंड लपवायचं, असल्या समाजाची दिशाभूल करणाऱ्या रंगाची उधळण करणाऱ्या मंडळींना भाबडे लोक बुध्दिजीवी समजतात. यातले काही केवळ वयाने जेष्ठ असलेले लोक आपल्या अपेक्षेचे सरकार निवडून नाही आले तर जनतेने आता प्रतिसरकार स्थापन करावे  असे `केविलवाणे`  रंग उधळत असतात.

शिक्षक: आलं लक्षात विवेक. परंतु आंदोलन करणारे नेते तर समाजहितासाठी झटत असतात ते सुध्दा....?

विवेक:  माफ करा सर, परंतु आंदोलनाचा मूळ विषय राहतो बाजूला आणि पुन्हा सुरु होते ती जातीयवादाची शिवराळ भाषा, धमक्या देण्याची भाषा, इतर जातीला हिणवण्याची भाषा. आपणच समाजाचे सर्वेसर्वा आहोत हा गैरसमज करून घेऊन एल्गार पुकारण्याची भाषा.....ही अवघ्या समाजात असंतोष पसरवणाऱ्या रंगाची उधळण नव्हे का?

शिक्षक:  खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे विवेक. परंतु इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांला एवढी समज कुठून आली?

विवेक:  सर, तुलनेने जरी आम्ही वयाने लहान असलो तरी आजुबाजुला काय घडतंय हे न उमजण्याइतकी आमची लहान नक्कीच नाही. आम्ही उद्याचे मतदार आहोत. या मंडळीनी असल्या गैर रंगाची उधळण करणं थांबवलं नाही तर यांचा भवितव्याचा बेरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बुरा न मानो.... होली है  असं वर्षातले ३६५ दिवस कुणी हेच म्हणू लागलं.......`तो  हमे बुरा लगेगा!

Sunday, February 23, 2025

उत्तराखंडच्या माणसिंग, भागीरथीने अपोलो टायर्स नवी दिल्ली मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले

 



गोपी चंद, अजिंक्याने २५,००० हून अधिक धावपटूंना धाव सुरू करण्याचा कळा दिला

नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी: उत्तराखंडच्या माणसिंगने एका थंड सकाळी नवी दिल्ली मॅरेथॉन २०२५ मध्ये अंतिम मार्गावर जलद धाव घेत प्रतिष्ठित विजेतेपद जिंकले. ३५ वर्षीय या एलीट धावपटूने २०२४ एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप जिंकली असून, २:१५:२४ वेळेत ही रेस पूर्ण केली आणि तासांपासून नामांकित प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. प्रदीप चौधरी (२:१५:२९) आणि अक्षय सैनी (२:१५:३४) त्याच्या मागोमाग, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

पद्मश्री पुल्लेला गोपी चंद, भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षक, आणि माजी भारत कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी २५,००० हून अधिक धावपटूंना रेस सुरू करण्यासाठी झेंडा दाखवला. हे धावपटू आणि फिटनेस उत्साही विविध भागातून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

गोपी चंद यांनी मीडिया बरोबर बोलताना म्हटले, "मी आयोजकांना, प्रायोजकांना आणि प्रत्येक अॅथलीटला नवी दिल्ली मॅरेथॉनच्या यशासाठी अभिनंदन करतो."

रेस डायरेक्टर नगराज अडिगा, NEB स्पोर्ट्स, यांनी दिल्लीतील प्रसिद्ध लँडमार्क्स जसे की इंडिया गेट, लोधी गार्डन्स आणि कर्तव्य पथ या मार्गावरून रेस आयोजित केली.

अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष राजेश दहिया यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत सांगितले की, हे राष्ट्रीय मॅरेथॉनचे प्रमाणितपणे यशस्वी आयोजन झाले, ज्यात भारतातील सर्वोच्च धावपटू आणि विजेतेपदावर नजर ठेवणारे स्पर्धक सहभागी झाले.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास कुमार यांनी सांगितले की, त्यांनी विशेष सेवा सुरू केली होती ज्यामुळे धावपटू आणि प्रेक्षकांना नेहरू स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचता आले.

उत्तराखंडच्या भागीरथी बिष्टने महिलांच्या एलीट मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवले. तिने २:४८:५९ वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. ठाकोर भारतजी (२:४९:१६) आणि अश्विनी जाधव (२:५०:४८) यांच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्रेरणादायक उपक्रम म्हणून, मॅरेथॉनमध्ये समावेशी धाव आयोजित केली गेली, ज्यात ३३ किमान परिस्थितीतून आलेल्या मुलांनी प्रमुख अॅथलीटांसोबत धाव घेतली. तसेच, एक टीम व्हिज्युअली इम्पेअर धावपटूंची १० किमी रेसमध्ये सहभाग घेत होती, ज्यांना गाइड रनर्स इंडिया कडून सहाय्य मिळाले. या उपक्रमाने समाजातील समावेश आणि सामाजिक जबाबदारीला उजागर केले.

मॅरेथॉनने केवळ फिटनेस आणि सहनशक्तीच्या आत्म्याचा उत्सव साजरा केला, तर सरकार, कॉर्पोरेट भागीदार आणि समुदाय यांच्या सहकार्याने न्यू दिल्लीला जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रदर्शित केले.

निकाल

फुल मॅरेथॉन (एलीट)

पुरुष: १. माणसिंग (२:१५:२४); २. प्रदीप चौधरी (२:१५:२९); ३. अक्षय सैनी (२:१५:३४)

महिला: १. भागीरथी बिष्ट (२:४८:५९); २. ठाकोर भारतजी (२:४९:१६); ३. अश्विनी जाधव (२:५०:४८)

हाफ मॅरेथॉन

पुरुष: १. हरमंजोत सिंग (१:०४:३६); २. शुभम बलियान (१:०५:३२); ३. अभिषेक (१:०६:१२)

महिला: १. त्सेगानेशग मेकोन्नन (१:२३:५५); २. स्टांझिन डोलकर (१:२५:३१); ३. स्टांझिन चोंडोल (१:२५:४७)

१०K

पुरुष: १. पर्वेज (००:३०:२५); २. सोनू कुशवाह (००:३१:२४); ३. हरेंद्र कुमार (००:३१:४३)

महिला: १. अंजली देवी (००:३६:४६); २. सुधा सिंग (००:४०:०२); ३. विद्याश्री महादेवन (००:४२:०९)