Sunday, October 11, 2009

राज,उध्दवची कम्युनिटी वाढतेय
शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे निगर्वी,सालसं आणि ध्येय निश्‍चीत करून शांतपणे मार्गक्रमण करणारा नेता... तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोख ठोक भूमिका मांडणारा,काहीसा संतापी परंतु आपल्याला हवी असलेली कृती करूनच घेणारे,ती करण्यासाठी भाग पाडणारे,ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणून परिचित......ही दोन्ही व्यक्तीमत्व चालणं,बोलणं,वागण्यापासून सर्वच बाबतीत भिन्न. त्यांच्याप्रमाणंच त्यांचे चाहतेही अर्थात "फॅन्स'भिन्न असणं स्वभाविक आहे. राज आणि उध्दवच्या चाहत्यांची स्वतंत्र कम्युनिटी असून या कम्युनिटीवरील सदस्यां(मेंबर)च्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या दिड-दोन महिन्यांत आपण विविध संकेतस्थळाच्या कम्युनिटीवर नजर टाकल्यास निवडणूकींमुळे सदस्य संख्येचा आलेख वाढता वाढता वाढे...असाच राहिला आहे हे लक्षात येईल.राज्यातले कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच. हे ध्येय शिवसेना-भाजपा युतीने समोर ठेवला आहे. त्याचदृष्टीने प्रचाराची रणनिती निश्‍चीत करत युतीचा राज्यभर प्रचार सुरु आहे.
दुसरीकडे नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणूकीत नवे असूनही चांगले यश मिळवले. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत घवघवीत यश पक्षाला मिळेल. किंबहुना कोणत्याही पक्षाला मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्‍य नाही,ंअसा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आहे. प्रचारासाठी केवळ तिनच दिवस शिल्लक राहिल्याने जास्तीत जास्त भागात प्रचारासाठी जाण्यावर युती आणि मनसे नेत्याचा भर आहे. मतदानाच्या दिवशीचे मतदान आणि मतमोजणीनंतरचा कौल हे अद्याप दूर आहे. असे असलेतरी राज आणि उध्दवचे फॅन त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे शक्‍य नसल्याने स्क्रॅंप,चॅटींगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राज आणि उध्दव यांना आपल्या फॅनसला उत्तर देणं हे सध्याच्या निवडणूका रणधुमाळीत आजमितीस शक्‍य नाही. पण आपल्या फॅनचा हिरमोड होऊ नये. तसेच आपण त्यांच्या संपर्कात आहोत. हे दाखवण्यासाठी शिवसेना,मनसेने स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्‍नांना उत्तर दिले जाते. त्यांच्या सूचना,शुभेच्छा,प्रस्ताव स्विकारले जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फक्त आँकुर्टवरील कम्युनिटीचा विचार केला तर ही कम्युनिटी बरीच जुनी आहे. राज ठाकरे एमएनएस(18हजार234 सदस्य),राज ठाकरे मराठी हदयसम्राट(26,512)राज आँकुर्ट सेना(12,438),राज ठाकरे एक वादळ(11हजार908) याशिवाय फक्त राज ठाकरे नावाचे स्वतंत्र पाच फॅन्स क्‍लब असून त्यांच्या सदस्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. "मुंबई आहे मराठी माणसाची, नाही कोणाच्या बापाची....ज्यांनी लावली महाराष्ट्राची वाट, ते काय आणणार नवीन पहाट,सत्तेसाठी सातशे साठ,महाराष्ट्रासाठी एकच मराठी हदयसम्राट राज ठाकरे...यासारखे संदेश कम्युनिटीवर फॅन्स क्‍लबने दिलेले आहेत. मनसेची "डब्लू डब्लू मनसे ओराजी" ही स्वतंत्र वेबाईट आहेत त्याचे1हजार454 सदस्य आहेत."महाराष्ट्राचा सन्मान राखा,आम्ही तुमचा मान ठेवू,अन्यथा तुम्ही जाता तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा...आपला मुंबईकर असा संदेश दिलेला दिसतो. मनसे विद्यार्थी सेनेचे1हजार272 सदस्य आहेत. "जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र घडवूया' हे राज ठाकरेंचे आवाहन युवकांसाठी ठळकपणे दिले आहे. याच आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत मनविसेच्या झेंड्याखाली अनेक युवक एकत्र झाल्याचे त्यांच्या फॅन्स क्‍लबच्या वाढत्या संख्येहुन लक्षात येत आहे.राज ठाकरेंप्रमाणेच शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंही आपल्या फॅन्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या दैनंदिन नियोजनावरून दिसते. आँकुर्टवर उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे मोठे सहा ग्रुप आहेत. या ग्रुपच्या सदस्यांची संख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. यातलाच सातवा फॅन्सचा ग्रुप हा बाळासाहेबांबरोबर असलेल्या राज उध्दव यांना माननारा आहे. या ग्रुपचे सदस्य कमी असलेतरी त्यांचे संदेश लक्ष वेधतात. उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे संदेशही वेगळेपण जपणारे आहे. एका चाहत्यांने युतीच्या नव्या सरकारची अपेक्षा व्यक्त केलीय. तो म्हणतो"येणार या महाराष्ट्रात आता शिवशाही येणार,आता ज्यांची वेळ भरली, त्यानेच आडवे यावे,उध्दव ठाकरे...आपल्या काका-मामाची मिमिक्री करून मोठा झालेला हा नेता नव्हे, या नेत्याकडे स्वतःची ओळख आहे,ताकद आहे... असं वर्णन आहे. काहीं चाहत्यांना उध्दव हे चांगले राजकारणी आणि महाराष्ट्राला दिशा देणारे नेते वाटतात.काहींनी राजकारण हा त्यांचा पिंड नाही, ते लाजाळू आणि शांतपणे एकांतात रमणारे कलाकार आहे, त्यांची आपली फोटोग्राफी कला जोपासावी असे वाटते तर काहींना बाळासाहेबानंतरचा चांगला नेता म्हणून तेच योग्य असल्याचं वाटते.राज आणि उध्दवच्या या कम्युनिटवर चाहत्यांनी आपआपल्यापध्दतीने संदेश नोंदवत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. या दोन्ही नेत्यांना हे संदेश भविष्यातल्या राजकारणाला भरारी,प्रोत्साहन देणारेच ठरतील यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपली कम्युनिटी अपडेट ठेवण्याबरोबरच वेबसाईटही अपडेट ठेवण्यावर भर दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक,हाय फाय,व्हॅंनसारख्या कम्युनिटीवरही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन सभा,वार्ताकंनाच्या बातम्या,ठळक नोंदणी, मान्यवरांचे संदेश,छायाचित्र,व्हीडीओशुटींग सर्व काही उपलब्ध करून दिलेले दिसते. त्यासाठी आयटी क्षेत्रातला स्वतंत्र ग्रुपच तिथे काम करतो आहे. हे नमूद करावेसे वाटते.--- वुई हेट राज ठाकरे
....महाराष्ट्र नवनिर्माणचे स्वप्न पाहणाऱ्या किंबहुना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना पाठींबा देणारा स्वतंत्र वर्ग जगभर आहे. तसा त्यांचे विचार न पटणारा,त्यांचा विचारांना विरोध करणारा वर्गही असल्याचं जाणवते. त्यांना विरोध दर्शवणाऱ्या आँकुर्टवर वुई हेट राज ठाकरे(1हजार539सदस्य),आय हेट राज ठाकरे(1हजार156)आँल हिंदुस्थान हेट राज ठाकरे(831सदस्य) या कम्युनिटी आहेत. त्यांच्यावर आपआपल्यापध्दतीने संदेश देण्यात आले आहे."वुई सपोर्ट राज ठाकरे या कम्युनिटीवरील1हजार 219 सदस्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांच्या विचाराने हे सदस्य प्रेरीत झालेले दिसतात

कुणी आपला... कुणी परका...एकाच माळीचे मळी

आपला....कुणी परका....सगळे एकाच माळीचे मणी...
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. पण देश,राज्यातले गरीबी निर्मुलन, महागाई,भ्रष्टाचार,बेकारी यासारखे अनेक प्रश्‍न जैसे थे आहे.उलट दिवसागणिक या प्रश्‍नांची संख्या वाढत आहे. भूकेल्यांसाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजा सोडवण्यासाठी केंद्र-राज्यांच्या योजना अनेक आहे. त्याचे नियोजन नसल्याने यशस्वी अमंलबजावणी होत नाही. त्यात अनेक पळवाटा आहेत त्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहतांना दिसतात....सरकारची टर्म संपते...पाच वर्षानी निवडणूका येतात....पुन्हा तेच पक्ष,तेच नेते...बेकारी,भ्रष्टाचार,गरीबी दुर करण्याची तीच पोकळ अश्‍वासने...सोडवण्याचे काही नियोजन नाही.....सारं काही तेच तेच मग मतदान करायचे कशासाठी असा प्रश्‍न नागरीकांना पडला तर त्यात नवल नाही.... होय हे खरं आहे पक्ष,नेत्यांबद्दल असलेला संताप त्यांच्या संवादातून जाणवतो...केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यात आलेले चाकरमानी मतदानासाठी आपल्या गावी न जाण्याचा प्रश्‍न यंदाही ऐरणीवर आहे.राज्य घटनेने प्रत्येक नागरीकांला मतदानाचा हक्क दिला आहे. या आपल्याला मिळालेल्या हक्कांचा योग्य वापर करून पात्र उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. नागरीकांनी मतदान करावे.यासाठी निवडणूक आयोगापासून विविध सामाजिक संस्था,मंडळे,वृत्तपत्र समुह जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन करतात. या आवाहनालाप्रतिसाद देत अनेक नागरीक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. पण समाजात असाही एक वर्ग आहे की,ज्याला राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार,घोषणा याबद्दल काही देणे घेणे नाही. हा वर्ग आपल्या व्यवसाय,कामातच अधिक लक्ष देतो. यात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित नागरीकांचाही तितकाच सहभाग असतो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं स्वभाविकच मतदान कमी प्रमाणात होते. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला मिळालेला हा मुलभूत हक्क नागरीक का नाकारतात...याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून हे जाणवते. मुंबईत पनवेल भागात उपहारगृह चालवणारे किसन तेलुरे,सुलोचना तेलुरे हे दाम्पत्य मुळचे बिड जिल्ह्यातले. गेल्या बारा वर्षापासून ते मुंबईत आहे. पण एकदाही मतदान करण्यासाठी आपल्या गावी गेले नाही अथवा मुंबईतही मतदान केले नाही. गावाकडे असतांना केव्हातरी मतदान करायचे पण आता टाळतात. पक्ष,नेत्यांबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. निवडून कुठलाही पक्ष येवो, काही फरक पडत नाही, महागाई,बेकारी वाढते आहे. सर्व सारखेच आहे असं त्यांना वाटते. कळंबोली कॉलनीतला गफूर सैय्यद बुलढाण्याचे आहे. भंगारव्यवसाय सुरु करून त्यांनी आपला जम बसवला आहे. सैय्यद परिवाराला निवडणूक,राजकारण हे विषय आवडत नाही. आपले प्रश्‍न आपल्यालाच सोडवावे लागणार आहे त्यासाठी नेते,पक्ष थोडेच येणार आहे, त्यामुळे मतदान वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. निवडणूकीपुरते पक्षाचे नेते येतात,अश्‍वासन देऊन निघून जातात आणि नंतर कधी फिरकत नाही. त्यामुळं मतदान नकोच असे गफूरभाई सांगतात. याच भागातले हातगाडीवर व्यवसाय करणारे राजाराम जाधव हे मूळचे धुळ्याचे. त्यांनाही राजकारणबद्दल प्रचंड चिड आहे. पक्ष,नेते म्हणजे ढोंगीपणा आहे.ढोंग करून सत्ता,पैसा मिळवायचा आणि त्यांचा उपयोग आपल्या परिवारासाठी करायचा असे त्यांचे म्हणणे आहे. आपला व्यवसाय बंद ठेवून मतदान करण्यासाठी गावाकडे जाणे त्यांना पसंत नाही. नावडे भागातल्या एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ललित शुक्‍ल या सुशिक्षित युवकांच्या भावना तीव्र आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष पुर्ण झाली. पण देश,राज्यातले मुलभूत प्रश्‍न काही सुटले नाही, उलट बेकारी,महागाई,भ्रष्टाचार वाढला. या सर्व बाबींना पक्ष,नेतेच जबाबदार आहे. त्यामुळे भारताचा पुरेसा विकास झालेला नाही असं त्याला वाटते. सध्या राजकारणात नेतेमंडळीच्या परिवारतल्या प्रवेशाबाबत त्यांना नापसंती व्यक्त केली. या काही प्रातिनिक प्रतिक्रीया आहेत. पण समाजात असे अनेक घटक आहे. त्यांना राज्यकर्ते,नेते,पक्ष त्याचे विचारांबद्दल अनास्था आहेत. यात विशेषतः सामान्य नागरीकांबरोबरच बाहेरगावाहुन आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मतदान करण्याबद्दल जनजागृतीचे प्रयत्न अधिक व्हायला हवेत. मतदानापासून दुर राहणारा हा वर्ग मतदानाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी सरकारदरबारी अधिक प्रयत्न व्हावेत असाही सूर व्यक्त होऊ लागलायं. नागरीकांत नेते,पक्षाबद्दल अनास्थेची भावना निर्माण होणे हे चूकच आहे. त्यासाठी नेते,पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची आज गरज आहे असे वाटते.