Friday, April 11, 2025

रूग्णाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कंबरेच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला आले यश

 


       नाशिकः  वय ९१.....वजन फक्त ३३ किलो....साडी नेसतांना घरात पाय घसरून पडलेल्या एका वृध्द महिलेच्या कंबरेचे हाड( हिप जॉईंट) मोडले, निखळले अगदी घरांतच ती वृध्द महिला पडून, तिला उठवेना तसेच बसवेनाही,...पण कुटुबांने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना घरी बोलून कंबरेचा एक्स रे काढले, हाड निखळले असल्याने तसेच तातडीने शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला अस्थिरोग तज्ञ डॉ.जुगल पटेल,डॉ.प्रतीक पटेल यांनी दिला. वय जास्त आणि वजन कमी यामुळे ही शस्त्रक्रीया करणे हे एक जोखीम होती, डॉक्टरांसमोरही एक आव्हान होते, पण रूग्णांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला..

     त्याचे झाले असे, पोकार कॉलनी येथे राहणाऱ्या आणि ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या साधक असलेल्या लक्ष्मी श्यामदास अलवाणी(वय ९१ वर्षे) या केंद्रात जाण्यासाठी साडी नेसत असतांना त्यांचा साडीत पाय अडकला आणि त्या जागेवरच पडल्या आणि कंबरेचे हाड निखळले. वय खूप असल्याने जवळच असलेल्या जीवक हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना घरी बोलून त्यांचा एक्स रे काढण्यात आला. त्यात कंबरेचे हाड मोडल्याने, गॅप पडल्याचे( हिप जॉईंट) दिसले. शस्त्रक्रीया न केल्यास त्यांना जागेवरच बसून रहावे लागेल आणि तातडीने शस्त्रक्रीया केल्यास किमान घरभर तरी त्या चालू शकतील,असे डॉक्टरांनी सांगितले, रूग्णालयात दाखल केले. पण वय जास्त,वजन कमी आणि भूल दिली तरी ती चढेल,पुढे काय होईल, त्यातही यश कमी आणि जोखीमच अधिक असेल अशा सर्व बाबींची डॉक्टरांनी कुटूंबाना कल्पना दिली.

कुटूंबाचा शस्त्रक्रीयेचा निर्धार अन् डॉक्टरांचे परिश्रम

अखेर कुटूंबाने त्या वृध्द महिलेवर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेला मधुमेह,रक्तदाब यासारखे कुठलेही आजार किंवा शस्त्रक्रीया नाही तसेच एकही गोळी नसल्याने ती महिलाही शस्त्रक्रीयेस तयार झाली, तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि  डॉ.पटेल यांनी केलेल्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर शस्त्रक्रीया अखेर यशस्वी झाली. एक दिवस आपत्तकालीन कक्षात ठेवल्यानंतर तिला साधारण कक्षात स्थलांतरीत करण्यात आले आणि त्यानंतर दोन चार दिवसात घरीही पाठवण्यात आली. आता ती महिला पुर्वीप्रमाणे आपली स्वतःची कामे हळूहळू करू लागली असून चालता फिरताही येऊ लागले आहे.

   मी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी गेल्या तीस वर्षापासून जोडली गेलेली आहे, आमच्या केंद्रात ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवा ही नियमित चालते, माझाही या सर्व कार्यक्रमात नेहमीच सहभाग असतो, या नित्यध्यानधारणा आणि सेवेमुळे माझी इच्छाशक्ती वाढली आहे, नकारात्मक भाव दूर जाऊन एक सकारात्मक उर्जा या सर्व क्रियेतून मला मिळते, त्यामुळेच ही अवघड वाटत असणारी शस्त्रक्रीया सहजपणे होऊन गेली मला कळलेही नाही. नियमित साधनेचा उपयोग होत असतो म्हणून सर्वांनी कुठल्यातरी ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवेत आपले योगदान द्यायला हवे असे वाटते

श्रीमती लक्ष्मी श्यामदास अलवाणी,साधक,प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र,मेरी

Thursday, April 3, 2025

`ऊर्जे`वर सकारात्मक विचारमंथन,इजीएनचा महत्वपूर्ण पुढाकार

 


    

पर्यावरण….हवामान,जलवायु,माती,वनस्पती यासारख्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा एकत्रित संगम होय, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बदलते हवामान आणि सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या वाढत्या जंगलामुळे विजेसह इतर खूप सारे आपल्या समोर प्रश्न उभे राहिले आहे. अक्षय (सौर),पवन, रासायनिक, यांत्रिक ऊर्जा, अणु, गुरुत्वाकर्षण, प्रकाश, तेजस्वी, ध्वनी, गति, औष्णिक आणि विद्युत यासारख्या ऊर्जाप्रकारांद्वारे संचय करण्याचा प्रयत्न केंद्र-राज्य शासन,स्वायत्त,खाजगी संस्था अशा विविधस्तरावर सुरु आहेत. केवळ संचय नाही तर दिर्घकालीन उपाययोजनां, नियोजनही होऊ लागले आहे. पर्यावरण संवर्धन,रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अर्थ जर्नालिझम नेटवर्क(इजीएन)ने कोल्हापूरमध्ये याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संवादक,संपादकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. तिन्ही दिवस र्जाविषयावर सकारात्मक विचारमंथन होऊन भविष्यात एकत्रित काम करण्याचा संकल्प करण्यात आला. याच अनोख्या कार्यशाळेविषयी.......प्रा.श्रीकृष्ण कुलकर्णी

----------------------------

     पर्यावरण रक्षण,संवर्धन,हवामान बदलासारख्या ज्वलंत विषयावर काम करणाऱ्या अनेक सरकारी,खाजगी संस्था, कार्यकर्ते भारतात कार्यरत आहे. सर्वांगांने पर्यावरणाचा समतोल कसा साधला जाईल, यादृष्टीने सारेचजण वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत असतात. पण समाजात हवी त्याप्रमाणात जनजागृती,प्रबोधन होतांना दिसत नाही, त्यामुळे पर्यावरण,ऊर्जा,हवामान यासारखे विषय हे मर्यादित राहतात. आजच्या युगात पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऱ्हासामुळे मानवी कृती जबाबदार ठरत असल्याचे काही उदाहरणांवरून आपल् लक्षात येते. ऊर्जा संवर्धन,जलसंवर्धन,कचऱ्यांचे योग्य पध्दतीने निस्तारण(विल्हेवाट),प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टींमुळे पर्यावरणाचा समतोल चांगल्या पध्दतीन साधता येऊ शकतो. यासाठी अर्थ जर्नालिझम नेटवर्क(इजीएन) ने व्यापक चर्चेसाठी हे तीनदिवसीय खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.



ऊर्जा,जलसंवर्धन अन् कचऱ्यांद्वारे बायोगॅस निर्मिती

    प्रत्येक वर्षी २२ एप्रिलला पृथ्वी दिन आपण साजरा करतो. या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम होतात. पण हे सर्व प्रबोधन,जनजागृती त्या दिवसापुरतीच मर्यादित असते. वास्तविक पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा व्यापक विषय असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनातील विविध घटक,बाबींचा सुत्रबध्द पध्दतीने नियोजन केल्यास याच छोट्या छोट्या बदलांद्वारे मोठे परिणाम,परिवर्तन होऊ शकते. या तीन दिवसीय कार्यशाळेत याच क्षेत्रांतील तज्ञांनी विविध बाबींवर विशेष भर दिला. पहिल्या दिवशी पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावंकर यांनी सर्व संवादक,संपादकाचे स्वागत करत इजीएनची पर्यावरण व ऊर्जा क्षेत्रातील वाटचाल विषद केली. `इजीएन` ची भारताची जबाबदारी सांभाळणारे व्यवस्थापक जॉयदिप सेन गुप्ता यांनी भारतातील अक्षय (रिन्युएबल एनर्जी) ऊर्जेची स्थिती आणि ग्रीन हायड्रो प्रकल्पांवर आकडेवारीसह सविस्तर प्रकाशझोत टाकला.



हवामान बदलाचा कोकणावर मोठा परिणाम

  पर्यावरण अभ्यासक लेखक सतिश कामत यांनी हवामान बदलाचा कोकण परिसरावर होणारा परिणाम मांडला. या बदलामुळे पांरपारिक शेती,व्यवसाय सोडून लोक पर्यटन,मत्स व पुरक उद्योगासारख्या अन्यत्र व्यवसायांकडे वळाले आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी कोकणात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना विरोध होत असल्याची कोकणवासियांची मानसिकता त्यांनी नमूद केली. हवामान,पर्यावरण क्षेत्रात कामाची उभारणी करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी नव्या काळात हवामान बदल होत असतांना उर्जा टिकविण्याची आव्हाने मांडली. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात अणुउर्जा तज्ञ रमेश माथम यांनी अणूउर्जानिर्मिती ही छोट्या स्वरूपाच्या प्रकल्पांसाठी कशापध्दतीने( स्मॉल मॉड्युलर रिअँक्टर) पुरक ठरू शकते याबद्दल विश्लेषण केले.




किर्लीस्कर ऑईल इंजिन,महापालिका प्रकल्पांना भेटी

कोल्हापूर भागातील किर्लोस्कर आँईन इंजिनच्या प्रकल्पांला संवादक,संपादकांनी भेट देत तेथील सौर उर्जा,बायोगॅस,पवन उर्जा,इलेक्ट्रीक्ल वीज निर्मिती, जनरेटर प्रोजेक्टची सविस्तर माहिती घेतली.कचऱ्यापासून बायो डिझेल तयार करणे आणि बायोगॅसचा वापर करून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नास्ता,जेवन तयार करण्याचे प्रकल्प हे खरोखरच वाखण्याजोगे होते, कोल्हापूर महापालिकेचा खतप्रकल्प, तयार होणारे खत, कचऱ्यांपासून बायो गॅस आणि उर्जा निर्मितीचा त्याच ठिकाणी होणारा पुर्नवापर हे सुध्दा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अखेरच्या दिवसाच्या सत्रात प्रयास(पुणे) संस्थेचे शंतनु दिक्षित यांनी महाराष्ट्रातील अक्षय उर्जा(रिन्युएबल एनर्जी) निर्मिती घर,कृषी,उद्योग,व्यवसाय यासारख्या क्षेत्रांसाठीचे २०३०पर्यतचे ध्येय,प्रत्यक्ष निर्मिती,गरज आणि भविष्यातील साठवणूक, केंद्र,राज्य सरकारचे धोरण हे आकडेवारीसह सविस्तर मांडले. सर विश्वरैय्या यांच्या मार्गदर्शनाया विविध सत्राच्या तज्ञांच्या उर्जाविषयक सकारात्मक चर्चेमुळे पुढील काळात काम करण्यास नक्कीच उभारी मिळेल, यात शंका नाही