Sunday, October 11, 2009

कुणी आपला... कुणी परका...एकाच माळीचे मळी

आपला....कुणी परका....सगळे एकाच माळीचे मणी...
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. पण देश,राज्यातले गरीबी निर्मुलन, महागाई,भ्रष्टाचार,बेकारी यासारखे अनेक प्रश्‍न जैसे थे आहे.उलट दिवसागणिक या प्रश्‍नांची संख्या वाढत आहे. भूकेल्यांसाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजा सोडवण्यासाठी केंद्र-राज्यांच्या योजना अनेक आहे. त्याचे नियोजन नसल्याने यशस्वी अमंलबजावणी होत नाही. त्यात अनेक पळवाटा आहेत त्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहतांना दिसतात....सरकारची टर्म संपते...पाच वर्षानी निवडणूका येतात....पुन्हा तेच पक्ष,तेच नेते...बेकारी,भ्रष्टाचार,गरीबी दुर करण्याची तीच पोकळ अश्‍वासने...सोडवण्याचे काही नियोजन नाही.....सारं काही तेच तेच मग मतदान करायचे कशासाठी असा प्रश्‍न नागरीकांना पडला तर त्यात नवल नाही.... होय हे खरं आहे पक्ष,नेत्यांबद्दल असलेला संताप त्यांच्या संवादातून जाणवतो...केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यात आलेले चाकरमानी मतदानासाठी आपल्या गावी न जाण्याचा प्रश्‍न यंदाही ऐरणीवर आहे.राज्य घटनेने प्रत्येक नागरीकांला मतदानाचा हक्क दिला आहे. या आपल्याला मिळालेल्या हक्कांचा योग्य वापर करून पात्र उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. नागरीकांनी मतदान करावे.यासाठी निवडणूक आयोगापासून विविध सामाजिक संस्था,मंडळे,वृत्तपत्र समुह जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन करतात. या आवाहनालाप्रतिसाद देत अनेक नागरीक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. पण समाजात असाही एक वर्ग आहे की,ज्याला राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार,घोषणा याबद्दल काही देणे घेणे नाही. हा वर्ग आपल्या व्यवसाय,कामातच अधिक लक्ष देतो. यात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित नागरीकांचाही तितकाच सहभाग असतो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं स्वभाविकच मतदान कमी प्रमाणात होते. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला मिळालेला हा मुलभूत हक्क नागरीक का नाकारतात...याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून हे जाणवते. मुंबईत पनवेल भागात उपहारगृह चालवणारे किसन तेलुरे,सुलोचना तेलुरे हे दाम्पत्य मुळचे बिड जिल्ह्यातले. गेल्या बारा वर्षापासून ते मुंबईत आहे. पण एकदाही मतदान करण्यासाठी आपल्या गावी गेले नाही अथवा मुंबईतही मतदान केले नाही. गावाकडे असतांना केव्हातरी मतदान करायचे पण आता टाळतात. पक्ष,नेत्यांबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. निवडून कुठलाही पक्ष येवो, काही फरक पडत नाही, महागाई,बेकारी वाढते आहे. सर्व सारखेच आहे असं त्यांना वाटते. कळंबोली कॉलनीतला गफूर सैय्यद बुलढाण्याचे आहे. भंगारव्यवसाय सुरु करून त्यांनी आपला जम बसवला आहे. सैय्यद परिवाराला निवडणूक,राजकारण हे विषय आवडत नाही. आपले प्रश्‍न आपल्यालाच सोडवावे लागणार आहे त्यासाठी नेते,पक्ष थोडेच येणार आहे, त्यामुळे मतदान वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. निवडणूकीपुरते पक्षाचे नेते येतात,अश्‍वासन देऊन निघून जातात आणि नंतर कधी फिरकत नाही. त्यामुळं मतदान नकोच असे गफूरभाई सांगतात. याच भागातले हातगाडीवर व्यवसाय करणारे राजाराम जाधव हे मूळचे धुळ्याचे. त्यांनाही राजकारणबद्दल प्रचंड चिड आहे. पक्ष,नेते म्हणजे ढोंगीपणा आहे.ढोंग करून सत्ता,पैसा मिळवायचा आणि त्यांचा उपयोग आपल्या परिवारासाठी करायचा असे त्यांचे म्हणणे आहे. आपला व्यवसाय बंद ठेवून मतदान करण्यासाठी गावाकडे जाणे त्यांना पसंत नाही. नावडे भागातल्या एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ललित शुक्‍ल या सुशिक्षित युवकांच्या भावना तीव्र आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष पुर्ण झाली. पण देश,राज्यातले मुलभूत प्रश्‍न काही सुटले नाही, उलट बेकारी,महागाई,भ्रष्टाचार वाढला. या सर्व बाबींना पक्ष,नेतेच जबाबदार आहे. त्यामुळे भारताचा पुरेसा विकास झालेला नाही असं त्याला वाटते. सध्या राजकारणात नेतेमंडळीच्या परिवारतल्या प्रवेशाबाबत त्यांना नापसंती व्यक्त केली. या काही प्रातिनिक प्रतिक्रीया आहेत. पण समाजात असे अनेक घटक आहे. त्यांना राज्यकर्ते,नेते,पक्ष त्याचे विचारांबद्दल अनास्था आहेत. यात विशेषतः सामान्य नागरीकांबरोबरच बाहेरगावाहुन आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मतदान करण्याबद्दल जनजागृतीचे प्रयत्न अधिक व्हायला हवेत. मतदानापासून दुर राहणारा हा वर्ग मतदानाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी सरकारदरबारी अधिक प्रयत्न व्हावेत असाही सूर व्यक्त होऊ लागलायं. नागरीकांत नेते,पक्षाबद्दल अनास्थेची भावना निर्माण होणे हे चूकच आहे. त्यासाठी नेते,पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची आज गरज आहे असे वाटते.

No comments:

Post a Comment